Monday 20 July 2020

चिंतन......सद्भावनांचे.....3





                                                                                   स्वभाव 



 एखाद्याविषयीची जवळीक स्वभावातून होत असते. जर आपल्या विचारांशी स्वभाव मिळता-जुळता असेल तर मैत्रीची लांबी पुढे वाढते व ती तशी टिकतेही. पण विचारांची जर फारकत दिसली तर मैत्रीचा हात आखडता घेतला जातो. प्रसंगी ती संपतेदेखील. म्हणूनच समविचारी व्यक्तीमत्त्व समस्वभावामुळे एकत्र येतात. स्वभाव मैत्री टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो. या स्वभावामुळे अनेक फायदे व तोटे संभवतात. स्वभाव एकमेकांना जोडतो. तर तोच स्वभाव एकमेकांना तोडतो. स्वभावाचे अनेक पैलू व प्रकार आहेत. व्यक्ती-व्यक्तीनुसार त्यात बदल होत असतो. प्रत्येकाजण एका स्वभावानुसार असतो. एखाद्याच वागण, बोलण, त्याचे विचार, उच्चार व आचार या गोष्टी त्याचा स्वभाव ठरवतात. ज्या पद्धतीने तो विचार करतो, विचारांच्या सुसंगत बोलतो आणि बोलल्याप्रमाणे किंवा बोलण्याविरुद्ध वागतो, तसा त्याचा स्वभाव आहे असे आपण सर्वसाधारणपणे म्हणतो. प्राथमिकदृष्ट्या स्वभाव ओळखण्यासाठी या गोष्टी उपयोगी पडतात. पण या सर्व वरकरणी बाबी मानाव्या लागतील. व्यक्तीच्या पूर्ण परिचयासाठी किंवा स्वभाव सर्वस्वी तपासण्यासाठी याव्यतिरिक्त बरेच बारकावे तपासावे लागतात. वरील मात्रा सर्वांनाच उपयोगी पडत नाही व ती कोणी उपयोगात आणण्याचा प्रयत्न केला तर कालांतराने पश्चाताप करण्याची पाळी येऊन ठेपते व त्या वेळी स्वतःच्या नशिबाला दोष देण्याखेरीज दुसरं काहीच उरत नाही. अनेक व्यक्तिमत्व आचार, विचार व उच्चार स्वतःसाठी एक व इतरांसाठी वेगळे अवलंबतात. बहुदा अशी व्यक्तिमत्व फसवी असतात. चांगल्या स्वभावाची माणसे चांगली असतीलच असे नाही. जगात अनेक चांगल्या स्वभावाच्या लोकांनी अक्षम्य गुन्हे केलेले आहेत.  तेव्हा फक्त आचार, उच्चार व विचार यांचा वरकरणी अभ्यास झाला तर आपण फसू शकतो. म्हणून व्यक्तीचा पूर्ण स्वभाव ओळखण्यासाठी आपणास वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करावा लागेल. तसा विचार आपण केला तर अनेक मजेशीर गोष्टींचा उलगडा आपल्याला होईल. कदाचित त्यावेळी आपला आपल्यावरीलसुद्धा विश्वास उडेल. एखाद्याच्या स्वभावातील बारकावे तपासायचे म्हटले तर तेथे फक्त ढोबळमानाने निरीक्षण करणे उचित ठरणार नाही. त्याच्या बारीक-सारीक गोष्टी आधी तपासाव्या लागतील व तपासलेल्या प्रत्येक बाबीचे विश्लेषणात्मक वर्णन मनात करावे लागेल. अशा अनेक छोट्या-मोठ्या निरीक्षणातून व अनुभवातून एखाद्याचा स्वभाव सांगणे किंवा ओळखणे योग्य होईल. यासाठी अनेक दिवसांचा, महिन्यांचा किंवा वर्षाच्या कालावधीत जाण्याची शक्यता आहे. म्हणूनच वरकरणी निरीक्षणांना व अनुभवांना स्वभाव तपासताना काही मर्यादा येतात. अर्थात सर्वच व्यक्तींचे स्वभाव अशा पद्धतीने तपासणे योग्य होणार नाही. पण त्याचबरोबर सर्वांसाठीच वरकरणी निरीक्षणही योग्य नव्हे. त्यामुळे आपल्या गरजेनुसार वरील बाबी वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने तपासल्या पाहिजेत.


 स्वभाव ही साचेबद्ध बाब आहे. 'सुंभ जळेल पण.....' ही म्हण स्वभावामुळेच तयार झाली असावी. ग्रीष्मातील तप्त ऊन सृष्टी जाळून टाकतं आणि मग रिमझिम धारा अमृत ओततात. एक नवा प्राण सगळीकडे उमलू लागतो. हिरव्या शालून सृष्टीचं लाजणार रूप पावलोपावली दृष्टीस पडते. झरे वाहतात. ओढा, नदी, नाले कधी नव्हे इतक्या लगबगीने खळखळून हसत पुढे जातात. पाखरं नवीन गाणी गुणगुणतात. झाडं गगणाच चुंबन घेण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात. एका पावसान कितीतरी जीवात चैतन्य ओतलेले असते. सृष्टीत होणारा हा दरवर्षीचा बदल किती मोहकात आणतो. ही मोहकता येते खरी पण ती टिकून राहण्यासाठी नव्हे. झाडाझुडपांना हे माहीत असते की ग्रीष्मात मी शुष्क होणार आहे. पाखरांना हे ठाऊक असतं की ग्रीष्मात आजची शीळ तोंडात नसेलही. पण म्हणून ती आज गुणगुणायची थांबत नाहीत. काहींना पाऊस पडला की अडचण होते. पावसाचा थेंब जरी अंगावर पडला तरी नाक गळत. हा दोष केवळ स्वभावाचा आहे. साचेबद्ध स्वभाव ग्रीष्मातही तसाच, शरद, हेमंत की, आणखीन कोणता ऋतू येवो, यांचा आपला स्वभाव तो स्वभावच. पावसाच्या स्पर्शाचा किंवा अंगाशी संग करणाऱ्या वाऱ्याशी जणू आपलं काही देणेघेणे नाही. ऊन पडो, पाऊस पडो, विजा कडाडो, हे मात्र स्तब्धच…! 

 बरीच माणसं हसताना अवघडल्यासारखी दिसतात. जणू हसण्याचे पिक आमच्याकडे पिकत नाही. त्यांच्या मते, जीवन म्हणजे नुसते दात काढणे नव्हे. जीवन म्हणजे हास्य नाही हे जरी बरोबर असले तरी जीवन म्हणजे गंभीरता नव्हे किंवा हासायच नाही असेही नव्हे. हास्य ही मानव जातीला दिलेली अनमोल देणगी आहे. इतर कोणताच जीव हसू शकत नाही. निदान हसताना दिसत नाहीत. सर्वजण गंभीर आहेत. जरी ते गंभीर नसले तरी हसू मात्र शकत नाहीत. खळखळून हसणे कित्येकाना जमतच नाही. हसताना सुद्धा हात राखून असे लोक हसतात. हसताना काय मागे ठेवून हसावे ? हसणे म्हणजे किती क्षणाची बाब. पण भविष्यातील स्वार्थ, काळज्या, अन् बरंच काही  मनाच्या कोपऱ्यात घर करून बसलेले असतात आणि तेच त्याला खळखळून हसू देत नाही. 

अलीकडे हास्याचे क्लब निघालेत, जिथे जाऊन हसून यायचं..…! पण तसे हसणे म्हणजे जणू हसण्याची केलेली निव्वळ प्रतारणा होय. हास्य म्हणजे दोन किलो साखर नाही. दुकानात जातो व घेऊन येतो.....! कधी हसाव हे ज्यांना ठाऊक नसतं असेच लोक अशा क्लबचे सदस्य असावेत किंवा हास्य त्यांच्या अवतीभोवती चुकूनही फिरत नसेल, अशीच मंडळी नियमित हास्यटॉनिक घेऊन येत असतील. किती आणि का हसावं हे जर शिकायचं असेल तर लहान बाळाकडून शिकावे लागेल. प्रत्येक बालकाच्या ओठावर निर्लेप हास्य परमेश्वराने ठेवले आहे. बालकं निरर्थक, निर्हेतुक हसतात. कधीही, कशालाही हसतात. का हसता म्हणून विचारलं तरी हसतात. हसू नका म्हटलं तरी हसतात. शांत रहा म्हटलं तरी हास्याची ठिणगी हळूच टाकतात. जीवन गंभीर जरूर आहे पण इतकही गंभीर नाही की हसायचं नाही. अनेक लोक हसताना खूप छान दिसतात. ती असतातही तशीच. म्हणून हसताना ती लोभस वाटतात. काही हसतात तर काही हसवतात. हसण्यापेक्षा हसवणे श्रेष्ठ आहे. कारण हसण्यासाठी जास्त विचार बाजूला करावा लागत नाही. पण हसवण्यासाठी सुख-दुःख, चांगल्या, वाईट भाव-भावना बाजूला ठेवून हास्यकारंजे उडवावी लागतात. हास्याचे अंकुर अनेकांच्या जीवनवेली बहरवतात. जीवन म्हणजे केवळ हास्यमिश्रित सुखदुःखांची मिलन आहे. जर जीवन कटू प्रसंगाने व्यापून राहील असेल तर हास्य या जीवन वाळवंटातील ओयासिस आहे, जिथं मनाला थोडा विसावा व सुख अनुभवता येत. हास्य हा अनुभव छोटा असला तरी त्यातून मिळणारी अनुभूती चिरकाल टिकणारी आहे. हसणं  आरोग्याला हितकारक आहे. हसरी माणसं उत्तम आरोग्य टिकवून ठेवतात. 

समाजात अनेक प्रकारची हास्य आपण पाहतो. बालकाच्या निर्हेतुक हास्यापासून वृद्धांचे अनुभवी हास्य आणि तरुणांच्या खळाळून हास्यापासून स्त्रियांच्या लोभस हास्यापर्यंत अनेकविध हास्यप्रकार आहेत. टोमणा मारणे, कोपरखळी, हास्याची उकळी, हस्यकल्लोळ, खसखस पिकाणें, खट्याळहास्य, स्मितहास्य, मिश्किल हास्य, रावणी हास्य,कापटी हास्य, इत्यादी, इत्यादी अनेक हास्य प्रकार स्वभावागणिक पहावयास मिळतात. हास्यप्रकारात आपणाला याहीपेक्षा खोलवर जाऊन डोकावता येईल. पुष्कळ लोकांचे स्वभाव अतिगंभीर गोष्टी हलक्याफुलक्या करणारा असतो.  त्यांना त्यावर उत्तम तोडगाही मिळतो. समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वस्वी वेगळा ठेवतात. याउलट अनेकांचा स्वभाव साध्या गोष्टीकडे अतिगंभीरतेने पाहण्याचा असतो. त्यामुळे मूळ समस्या अधिकच जटिल होऊन जाते व प्रसंगातील गंभीरता वाढत राहते. 

 हिंसक स्वभाव मानवजातीसाठी उणे बाजू आहे. अनेक व्यक्तींचा स्वभाव आक्रमक असतो. प्रत्येकाने तसे आक्रमक असावे सुद्धा.....! पण आक्रमक असणे फक्त अन्यायाविरुद्ध अधिक खुलून दिसते. अन्यत्र नाही. बऱ्याच लोकांचा स्वभाव भांडखोर असतो. जणू वाद करणे हा जन्मसिद्ध हक्क आहे. अशी व्यक्तिमत्व अनेक गंभीर प्रसंग कोणतेही कारण नसताना स्वतःवर ओढवून घेतात व संकटात फसतात. पण तरीही स्वभाव मात्र यत्किंचितही बदलत नाहीत. अशा व्यक्तींची केवळ उपस्थिती वादाचे कारण ठरते. याला कारणीभूत स्वभावच आहे. स्वभावाचे रेखाचित्र मनःपटलावर इतके खोलवर कोरलेले असते की, अशी माणसं वेगळ्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करू शकत नाहीत. मत्सर, हेवादेवा हे वादाचे प्रमुख कारण आहे. भारतात न्यायप्रणाली आहे म्हणून बरे. नाहीतर मानव जातीने वाद हा विषय कोणत्या थराला नेला असता देव जाणो. तरीही वाद सोडवता सोडवता न्यायव्यवस्था पुरती थकून जाते. जीवनात वाद आवश्यक आहेत का? वादाव्यतिरिक्तही चिंतनशील बाबी जीवनात आहेत. पण स्वभाव इतका साचेबद्ध असतो की, वाद आपोआप तयार होतो व एका नव्या अपरिचित वळणावर जीवन येऊन ठेपते. अर्थात तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि बऱ्याच गोष्टी हाताबाहेर गेलेल्या असतात. 

 व्यक्तीव्यक्तीच्या स्वभावात अंतर आहे. व्यक्ती बदलली की स्वभाव बदलतो. स्वभाव वर्तणुकीवरून ठरतो. तर वर्तन विचारांवरून आणि विचार अवतीभोवतीच्या समाजावरुन आणि संस्कारावरून ठरतात. अनेकांचा स्वभाव 'मी'पणाने काठोकाठ भरलेला असतो. बोलणाऱ्या प्रत्येक शब्दातून व वाक्यातून हा 'मी'पणा ओसंडून वाहतो. इतरांवर छाप मारण्याचा तो एक प्रकार असतो. वास्तविक अशी 'मी'पणाच्या प्रौढीची चोरी बोलताना लगेच सापडते. पण तरीही अशी माणसं बदलण्यास तयार नसतात. पुष्कळ लोक  महान कार्य करतात. जगाला त्याचा साधा थांगपत्तादेखील नसतो. अशी माणसं फक्त चांगल्यासाठी जगतात. चांगलंच करतात. चांगलं स्वतःसाठी करतात व चांगलं पीडित समाजासाठी करतात. पण मी हे केले, माझ्यामुळेच हे शक्य झाले, याचा साधा उच्चारदेखील त्यांच्या मुखातून येत नाही. अशी व्यक्तींचा स्वभाव जणू चांगल करण्यासाठी व चांगलं करून पडद्यामागे राहण्यासाठी भूकेलेला असतो. हातून होऊन गेलेली प्रत्येक चांगली कृती रसभरीत कथन करण्यासाठी नसते. ती विसरून जाण्यासाठी असते. इतरांचं भलं करण्यात जर कोणी झटत असेल, तर त्याने त्याचं झटणे अलगद विसरून जाणारी माणसं, माणसातील देव होत.

 स्वभाव व्यक्तीच्या ओळखीसाठी खूप उपयोगी पडतो. किंबहुना अनेक व्यक्ती त्यांच्या स्वभावावरून सगळ्यांना परिचित असतात.  अनेकांचे स्वभाव कष्टाळू असतात. जीवनात यश किंवा अपयश नेहमीच येत असतं. जी व्यक्तिमत्व कष्टाळू असतात, ती नेहमीच यश व अपयश एकाच भावनेतून पाहतात. मात्र कष्ट थांबवत नाहीत. त्यांचे कष्ट अविरतपणे चालूच असते. अशा स्वभावाच्या लोकांना इतर बाबतीत मुळीच रस नसतो. आपलं काम भलं आणि आपण भलं. एक काम संपलं की दुसरं काम त्यांची आतुरतेने वाट पाहत. अशी माणसं कामाला त्यांच्या आयुष्यात सर्वात आधी प्राधान्य देतात. अशा या कष्टाळू स्वभावाशिवाय आळशी स्वभावाची व्यक्तिमत्वही पहावयास मिळतात. आळस माणसाचा शत्रू असला तरी बऱ्याच लोकांना आळस मित्र असल्याचे चित्र पहावयास मिळते. अशांना आळसामुळे आयुष्यभर जबर नुकसान सोसावे लागते. प्रसंगी वाईट दिवस येण्याची शक्यताही असते. परंतु त्यांची चूक त्यांना उमजली तर नवल......! आळसाने बुद्धीला गंज चढतो. आळस करणे म्हणजे प्रगतीला साखळदंड अडकवणे होय. आळस वाईट कृत्य करायला भाग पाडतो. आळसामुळे व्यक्ती सुखासीन, परावलंबी व लाचार बनू शकते. एक आळस अनेक अनर्थ बरोबर आणतो. क्षणाचा आळस आनंतासाठी दुःखाचा मूळ बनतो. पण आळशी स्वभाव मात्र बदलत नाही.

 काहींचा स्वभाव अतिलाजरा असतो. लाजणे तारुण्यात उठून दिसते. सर्वच ठिकाणी लाजणारा स्वभाव नसावा. काहींचा स्वभाव बडबडा असतो. काहींचा मिश्कील विनोद करण्याचा असतो. अशी विनोदी स्वभावाची व्यक्तिमत्व समाजात बरीच लोकप्रिय असतात. जर विनोदत स्वार्थ नसेल तर अशा व्यक्तिमत्वाने केलेल्या शाब्दिक कोटी निखळ हास्य निर्माण करतात. अशा लोकांचा स्वभावच नर्मविनोदी असतो. पु. ल. देशपांडे हे व्यक्तिमत्व अशाच प्रकारच निखळ, निःस्वार्थी विनोदी व्यक्तिमत्व होते. ज्यांना  त्यांचा सहवास लाभला ते खरोखरीच भाग्यवंत लोक होते. विनोद ऐकणे आणि साक्षात विनोद पाहणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. जणू साखरेची गोडी ऐकणे आणि साखर प्रत्यक्ष खाण्यासारखा तो प्रकार आहे. निस्वार्थी व अहिंसक विनोद हा उच्च कोटीतील आहे. हिंसक व पांचट विनोदावर निर्लज्यपणे विनोदवीर होऊ पाहणारे आंबटशौकीन  स्वभावाची माणसंही आहेत. अशा स्वभावाच्या लोकांना आपण परग्रहावरून येऊन विनोद करतो आहोत असं वाटत. आपणाला घरदार, आईवडील, बहिणभाऊ आहेत याचा विसर त्यांना पडतो व गावभराची घाण विनोदातून सदैव ओकतात. खरंतर तो विनोद नसून आंबट शौक पूर्ण करणारी पांचट चव असते. अशा विनोदाने अनेक जखमा होतात. विनोदाने केल्या जाणाऱ्या जखमांवर कोणताच मलम नाही. तेव्हा आंबटशौकीन्यांनी जिभेवर नियंत्रण ठेऊन निखळ विनोदावर भर देणे सामाजिक स्वास्थ्यासाठी हितावह आहे. छोट्या मोठ्या गमती-जमाती करणारी व्यक्तिमत्त्व समाजात जास्त लोकप्रिय असतात. अशा स्वभावाच्या माणसांना एकांतवास जणू खायला उठतो. माणसांशी त्यांचा लळा जास्त असतो.

 शास्त्रज्ञ, विचारवंत यांचे स्वभाव समाजातील इतरांपेक्षा वेगळे असतात. खरंतर ही देशाची बौद्धिक संपदा आहे. खूप जबाबदाऱ्या अशा व्यक्तींना पार पाडाव्या लागतात. ती काहीशी गंभीर आणि विचारी असतात. समाज आज जे सुख अनुभवतो आहे ते ह्या लोकांमुळेच. त्यामुळे अशा व्यक्तींना थोरपण जात व ते गेलेही पाहिजे. अथक परिश्रमातून शास्त्रज्ञ एखादा शोध लावतात व अखिल मानवासाठी त्यांचा शोध एक वरदान ठरून जातो. ज्ञात-अज्ञात जीव त्यांचे ऋणातित असतात. न्यूटनसारखी व्यक्तिमत्व खूप काही शोध लावून स्वतःला सर्वसामान्यातील सामान्य मानत होती. एक शास्त्रज्ञ असण्याव्यतिरक्त हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होय. या भावनेतून फक्त मानवता दृष्टीस पडते. सृष्टीत जन्म झालेला प्रत्येक जीव परमेश्वराने टाकलेली जबाबदारी चोखपणे पार पडतोय.  वास्तविक कोण काळा आहे, कोण गोरा आहे, कोण सुंदर तर कोण कुरूप. कोणी हुशार आहे तर कोणी मंद.  पण यात सर्वस्वी त्या व्यक्तीचा दोष अथवा चांगुलपणात कोणताच हात नाही. तसच जर कोणी हुशार, बुद्धिमान आहे, शास्त्रज्ञ आहे, तर त्यात नवल असं काही नाही. पण केवळ समाजासाठी झटणें, समाजासाठी झटल्यानंतरही समाजाचा ऋणी राहणे, यात मात्र निश्चित नवल आहे. असें नवल करणारी व्यक्तिमत्व थोडीच असतात. अशा स्वभावाची माणसं  प्रगल्भ असतात.

 स्त्रीमनाच्या स्वभावाचा कानोसा घेतल्यास अनेक मजेशीर बाबी आपल्यासमोर येतात. स्त्रिया समाजाचे भूषण आहेत. स्त्री आहे म्हणून वात्सल्य, प्रिती, जिव्हाळा, प्रेम, रसिकता आणि आपलेपणा आहे. स्त्रिया खरोखरीच खूप आघाड्यावर यशस्वीपणे लढत असतात. अनेक ठिकाणी लक्ष पुरवीत रोजची कामे त्या यशस्वीपणे करतात. घरातील प्रत्येकाला तोंड देत संध्याकाळपर्यंत मेटाकुटीला येतात. त्यात सासू नावाची वस्तू नीट स्वभावाची असेल तर ठीक. नाहीतर इतर व्यापाबरोबर हा ज्यादा ताणयुक्त व्यापही त्यांना यशस्वीपणे सांभाळावा लागतो. स्त्री जर नोकरी सांभाळणारी असेल तर संध्याकाळपर्यंत ती पुरती दमून जाते. पण तरीही स्त्रिया हार मानत नाहीत. भारतीय स्त्रीने तर खुप सोसले आहे. तरीही तिनं तिचं वेगळेपण जपलं आहे. समाजाने प्रत्येक वेळी तिच्यावर अन्याय केला आहे. तिनं तो सहनही केला आहे. पण आपली जगण्याची उमेद तिनं सोडली नाही.  स्त्रीमनाचा स्वभाव व्यापक दृष्टिकोनातून विचार केला जाण्याची आवश्यकता आहे. स्त्रियांमुळे समाजाला वैभव आहे. तर समाज स्त्रियामुळेच स्थिर व शांत आहे. या व्यतिरिक्त वैयक्तिक स्त्रीचा स्वभाव पाहिला तर तो प्रत्येक स्रीगणिक  वेगळा असतो. जरी तो वेगळा असला तरी प्रत्येक घरातील स्त्री घरातल्या सर्वांसाठी निस्वार्थी भावनेतून झटत असते. हे मात्र स्त्रीजातीतील साम्य आहे.

स्वभावामुळे व्यक्ती, व्यक्ती मुळे गाव, शहर आणि पर्यायाने देशाची बांधणी होत असते. व्यक्तीव्यक्तींचा स्वभाव चांगला, परोपकारी आणि दुसऱ्यांसाठी झटणारा असेल तर देशाची जडणघडण चांगल्या प्रकारे होऊ शकते. सृजनशील समाजाची निर्मिती हे अनेकांचे स्वप्न स्वप्नच राहिले आहे. अनेकांनी समाजाला चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न केला. पण समाजाचा आपला स्वभाव आहे तोच आहे. त्यात फारसा फरक जाणवत नाही. याला कारण समाज ढवळून न निघणें. समाजाचा स्वभाव बदलणे तसें फार कठीण काम आहे. समाजाचा स्वभाव कुत्र्याच्या शेपटीसारखा वाकडा आहे. तो कितीही नळीत घालून सरळ करण्याचा प्रयत्न केला, तरी मूळ पातळीवर येण्यास फारसा वेळ लागत नाही. कल्पनेतील सुस्वभावी समाज खरोखरीच मानव जातीसाठी एक आदर्श समाज होय. प्रत्यक्षात तो इतका सुस्वभावी होत नाही. कारण समाजातील विघातकी स्वभावाच्या विकृत्या होय. अशा स्वभावाच्या लोकांमुळे समाज जडणघडणीत मोठाच अडथळा निर्माण होतो व सामाजिक प्रगतीला खीळ बसते. समाज पुन्हा दिशाहीन होतो. प्रत्येकाने आपला स्वभाव सुस्वभावी केला तर आदर्श समाज निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.

 प्रत्येक व्यक्तीला ज्याप्रमाणे स्वभाव आहे, तसा स्वभाव सृष्टीतील वस्तू, पक्षी, प्राणी व प्रत्येक कणाला असतो. म्हणजे कडुनिंब, कारले कडू असतं, साखर गोड असते, चिंच आंबट, आवळा तुरट, इत्यादी इत्यादी. व्यक्तीच्या स्वभावातील बारकावे ज्याप्रमाणे टिपता येतात, त्याचप्रमाणे त्यांच्यातही स्वभाववैशिष्ट्ये टिपता येतात. त्यातील काहींचे स्वभावही परोपकारी आहेत. आपण कोणावर उपकार करतोय, याची मात्र त्यांना जाणीव नसते. वारा मुक्तपणे सर्वत्र संचार करतो. त्याच्यावर कोणीही मर्यादा आणू शकत नाही किंवा त्याच्यावर कोण नियंत्रण ठेवू शकत नाही. वारा वाहतो. पण वाहताना अनेकांना जगवतो याची कल्पना त्याला नाही. वारा प्रत्येक श्वासात आपल्यात एक नवा प्राण ओतून जातो. पण त्याची वाऱ्याबरोबर आपल्यालाही कल्पना नसते. ढग अचानक डोक्यावर येतात व बरसतात. त्यांच्या बरसण्याच्या स्वभावात आजतागायत बदल नाही. पाऊस पडणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. पण ती सकल मानवजातीसाठी वरदान ठरते. कदाचित याची जाणीव पावसाला नसेलही. पण तो आपला मूळ स्वभाव सोडत नाही. सूर्य अविरतपणे प्रकाश व उष्णता देतो. जगण्याची उब सूर्यच देतो. प्रकाशाने नटलेलं जीवन ही सूर्यापासून घेतलेली कविकल्पना आहे. त्याच्या उगवण्यात, मावळण्यात व मध्यावर आल्यानंतर उकडण्यातही जगणे आहे. तो जगवतो  व प्रत्येकाला जगण्याचं बळ देतो. आपल्याला वाढवतो आणि घडवतो. सूर्याच्या प्रत्येक क्षणाचे तेज वेगळे असते. त्याचे उगवणे म्हणजे चैतन्याची सळसळ सृष्टीत निर्माण करणे होय. त्याचं मावळन म्हणजे उद्याच्या उगवण्याच्या व फुलण्याच्या रम्य कल्पना होत. सूर्य उगवतो, तापतो व मावळतो. पण तो आपणाला दर दिवशी नवीन घडवतो. फक्त मानवालाच नाही, तर सर्व प्राणिमात्रासाठी तो वरदान ठरतो. त्याच्याइतकी परोपकारी भावना दुसरीकडे क्वचितच पहावयास मिळते. एरवी लाईटबिले भरून भरून शेवटी आपण अंधारातच  आहोत. जरा कल्पना केली, सूर्याने त्याचे लाईट बिल व हीट बिल मागितले तर? हातात अखंड दोरी घेऊन फास घेण्यापेक्षा आपण दुसरं काहीच करू शकणार नाही. ही कल्पना काहींना सोसणार नाही. पण सूर्य प्रकाश, उष्णता देतो. त्याचं साधं ऋणी राहणंसुद्धा आपण पसंत करत नाही. सूर्य म्हणजे चैतन्य, सूर्य म्हणजे जीवन आणि सूर्य म्हणजे जगणे आहे. नाहीतर अंधार म्हणजे तरी काय आहे? अंधार म्हणजे अज्ञान आणि अंधार म्हणजे मृत्यू होय. हा अंधार तर सगळीकडे आहे. त्यानेच तर जग व्यापून टाकले आहे. मनाचा एक कप्पा उघडला तर मनात अंधार ठायी ठायी वसलेला आहे. अंधाराच शब्दशः रूप नसेल, इतर रूप असेल. ते कोणतेही रूप असो. पण अंधार मात्र आहे. हा अंधार म्हणजे मृत्यूच आहे. कारण कोणाला जगायचं असेल तर प्रत्येक क्षणी मरावं लागतं आणि मरण कोणालाच आवडत नाही. आपण मरत नाही म्हणजे आपण जगून सुद्धा मुडदेच आहोत. सूर्याच्या प्रकाशाचा इतका व्यापक अर्थ आहे. त्याचा स्वभाव असा आहे की तो प्रत्येक क्षणी वाढवतो. वाढवतो प्रेमाने, मायेने व वात्सल्याने. सूर्य हे ब्रह्मांडातील मोठे तत्व आहे व आपण त्यांच ऋणी असणे गरजेचे आहे.

 परोपकारी तत्व हे फक्त मानवाकडेच आहे असं नाही. मानवाचे परोपकार समाज किंवा इतिहास ठळक अक्षरात नोंद करून ठेवतील. पण परोपकार मानवाव्यतिरिक्तही दुसऱ्या कोणी केला तर त्याची दखल इतक्या वाजतगाजत घेणे शक्य नाही. झाडे, झुडपे, लता, वेली यांचे स्वभाव खरोखरीच परोपकारी आहेत. झाडं काय देत नाहीत? सर्वच तर आपण त्यांच्यापासून घेत आहोत. आपण जरा ताण दिला व पाहिलं तर रोजचं अन्न वनस्पतीच पुरवत आहेत. अंगावरील वस्त्रे झाडच पुरवून आपली लाज राखताहेत. दैनंदिन वापरातील अनेक वस्तू  वनस्पतीपासूनच आपण घेतो. हा निव्वळ परोपकार नव्हे काय? काहीजण म्हणतील आम्ही त्या वस्तू विकत आणतो. पण तुम्ही पैसे कोणाला देता? झाडांना तर कुठे खिसे नाहीत....! माणसं सोडून इतर कोणीही सृष्टीत व्यापार करत नाहीत. खरेदी-विक्री हा मानवाने तयार केलेला सौदा आहे. या व्यापारानेच तर माणसामाणसात मोठी दरी निर्माण केली आहे. व्यापार नफ्याच्या आकड्यांवर चालतो आणि नफा पैशात पाहिला जातो. पैसा पाहण्यासाठी व तो मिळवण्यासाठी तर आपण सगळे धावतो आहोत. व्यापार करतो आहोत. पैसा मिळवता मिळवता आपण पक्के व्यापारी बनलो आहोत. व्यापारी बनता बनता आपण किती अनर्थ करतो आहोत? आपण सगळेजण तर एकत्र आहोत पण तरीही एक मोठी अनामिक दरी आपापसात आहे की जिच्यामुळे जवळ असूनसुद्धा एकमेकांपासून लांब आहोत. वनस्पती व्यापारी नसून आपल्यासाठी झटणाऱ्या मुक्या देवता आहेत. उन्हात मिळणाऱ्या सावलीचा थंडावा, पक्वान्नसुद्धा मिळवून देणार नाहीत. हिरव्या पानांनी भरलेली झाड पाहणे म्हणजे डोळ्यांनी वैभव पाहणे होय. झाड वाढतात, फुलतात आणि आपल्यासाठी फळ घेऊन येतात. त्यापुढे आपला व्यापार सुरू होतो.....! झाडाइतकं दानशूर कोणीही नाही. रंगीबेरंगी फुले म्हणजे सप्तरंगी जीवनाचा रंग आहे. फुलांचे रंग हा सृष्टीतील मोठा चमत्कार आहे व तो चमत्कार दरवर्षी होतो. आपण मात्र तो चमत्कार पाहण्यासाठी पुरते जागे नसतो. हा त्याहीपेक्षा मोठा चमत्कार आहे. जगण्याच्या धडपडीत आपण बरेच मागे राहतोय. इतकं मागे आहोत की आपल्यासाठी फक्त जगण शिल्लक राहतय.  फक्त जगणं बाकी असतं त्यावेळी जगुन सुद्धा त्या जगण्याला अर्थ नाही. ते निव्वळ बेरंगी जगणं होय. कळी उमलते व वाढते. ती आपली उगीचच उमलते. उमलते आपले सौंदर्य जपण्यासाठी, नाजूकपणा जपण्यासाठी आणि उमलते जगण्याचं आणि जगण्यातील रंग देण्यासाठी......! ही फक्त सेवाच होय. ईश्वराच्या पायदळी आपण फुले वाहतो. देवालाही फुलं खूप आवडतात. आवडतात कारण ती निरागस असतात. आवडतात कारण ती विविधरंगी असतात. आवडतात कारण ती इतरांना सुगंध देतात. फूलांचा स्वभाव असा सर्वाना आवडीचा आहे. त्यात ती कोणत्याच परिस्थितीत बदल करत नाहीत. झाड ऊन, वारा, पाऊस, दिवस, रात्र अनेक वादळ सोसत एका जागेवर स्थिर असतात. आपल्यासाठी स्थिरतेचा मोठा संदेश झाड देत नाहीत का? 

स्वभाव माणसाला जगवतो. स्वभाव तारतो तर स्वभावच मारतो. वर्तन आणि विचार स्वभाव मापण्याची किंवा तोलण्याची मापे आहेत. वर्तन आणि विचारांच्या सुसंगत व्यक्तीचा स्वभाव असतो. व्यक्ती स्वभावात सहसा बदल करत नाही. स्वभाव चांगला व आदर्श असेल तर त्यात बदल करणे गरजेचे नाही. पण स्वभावात जर काही उणिवा असतील तर स्वभाव बदलणे किंवा बदल करून घेणे, स्वतःसाठी तसेच इतरांसाठी फायद्याचे ठरते. आपण विचार करू शकतो. चांगल्या आणि वाईट गोष्टींचा न्यायनिवाडा करू शकतो. स्वभावातील किंवा वर्तनातील त्रुटी अंतर्मन स्पष्टपणे आपल्याला सांगत असते. त्याच आपण वेळीच ऐकलं पाहिजे. त्याचं तसं ऐकणं म्हणजे सुस्वभावी होणे होय. मनाची विचार करण्याची दिशा स्वभावाच्या जडण-घडणीतील महत्त्वाची बाब आहे. मनातील विचार वर्तन नियंत्रित करतात आणि त्यातूनच स्वभाव घडतो. विचार व वर्तनांची पाऊलं जर चांगल्या निरोगी दिशेने पडत असतील तर, एक आदर्श स्वभाव निर्माण झालाच म्हणून समजा. चांगला स्वभाव असणे म्हणजे तरी काय?  फुल सुंदर असतात. एक एक सुंदर फूल जोडून फुलांचा सुंदर हार तयार होतो. फुलांपेक्षा फुलांचा हार सुंदर दिसतो. तसेच एक एक वर्तन चांगुलपणाने जोडले तर चांगुलपणाचा हार स्वभावाच्या गळ्यात पडेल, की जी व्यक्ती तो परिधान करेल  ती निश्चितच चांगल्या स्वभावाची असेल. स्वभावातील स्वार्थ हा मनाचा गंज आहे. स्वभावातील अहंकार हा अज्ञानाचा नाजूक पडदा आहे. स्वभावातील अन्यायी पणा दुर्बलतेचा पुतळा आहे. अन्याय करणारी माणसं अन्याय सोसणाऱ्यापेक्षा अनेक पटींनी दुबळी असतात. तेव्हा स्वभावाशी निगडीत या काही विसंगत बाबी आहेत. त्याचा जर विसर्ग केला, तर आपण सर्वजण सृष्टीतील इतर तत्वाप्रमाणेच सुस्वभावी होऊ. त्या वेळी खऱ्या अर्थाने आपलं जगणं सुरू होईल व त्याच वेळी आपण खरं तर मरूनही जिवंत राहू शकू. 300306 ©Harish Gore

Prof. Agarwal sir Vaduj

 Dear Agarwal sir, It was pleasent experience for me to read your 'A Pryayer to My God, the Man'. A deep touch to heart by reading a...