Monday 6 July 2020

चिंतन.... सद्भावनांचे......१

                                                 संवेदनशीलता


 

संवेदनशीलता दोन प्रकारची असू शकते. शारीरिक संवेदनशीलता आणि मानसिक संवेदनशीलता. शारीरिक संवेदनशीलता वरवरची व अल्प कालावधीत काळाच्या पडद्याआड जाणारी व भूतकाळाच्या गर्द अंधारात दिसेनाशी होणारी आहे. तर मानसिक संवेदनशीलता ही प्रत्येकावर खोल परिणाम ठेवून जाणारी असते. एकूणच संवेदनशीलता मानवजातीची अनमोल भावना म्हणावी लागेल. जिथं जिथं भावनांचा प्रश्न येईल, तिथं तिथं संवेदनशीलता आवर्जून उपस्थित असते. प्रेम, दया, वात्सल्य, प्रीती, ही संवेदनशीलतेची लेकरं होत. तर क्रोध, लोभ, हिंसा हे तिचे शत्रू होत.

 

 

 संवेदनशील असणं हे उच्च व उदात्त व्यक्तिमत्वाच अविभाज्य अंग आहे. ज्यांच्या भावना मेल्या आहेत त्यांना संवेदनशील होणं अवघड आहे. किंबहुना संवेदनशीलता अंगी नसणे म्हणजे अशा व्यक्ती स्वार्थी, लोभट, असंस्कृत आणि पूर्णपणे  व्यावसायिक मानाव्या लागतील. बालवयात स्वामी विवेकानंदानी कलकत्त्याच्या रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या टांग्याखाली सापडणाऱ्या लहान बाळाला, आपला जीव धोक्यात घालून वाचवलं. टांगेवला व नरेन या दोघांनाही मने होतीच. पण नरेन अधिक संवेदनशील जाणवतो. मानवतेची महान भूमिका नरेनने कोवळ्या वयात पार पडली. टांगा अंगावर घालणारा व जीव धोक्यात घालून मुलाचे प्राण  वाचवणारा या दोघांनाही मने होतीच. पण टांगेवला संवेदनहीन तर नरेन संवेदनशील होता. परस्पर विरोधी मनाचा तो क्षण होता. बालवयात  मन जास्त संवेदनशील असतं असं म्हणतात. हळूहळू ही संवेदनशीलता  कमी होते व माणूस या दुनियेच्या दुष्टचक्रात अडकून क्रूर बनतो.  पण जे जाणीवपूर्वक  संवेदनांची जोपासना करतात ते खरोखरीच एक महान मूर्ती समान  महात्मे मानावे लागतील.

 

 क्रूरकर्मा कोणाला म्हणावे ? जो  अत्याचार,अन्याय, खून, दरोडे घालतो त्याला. पण माझ्या मते तर तोही क्रूरकर्मा म्हणावा लागेल जो नाजुक फ़ुलांना आपल्या पायदळी तुडवतो.  अर्थात खून करताना व फुले रेंदताना त्याची संवेदनशीलता ही एकाच प्रकारची असू शकते.  फुलांइतकं नाजुक दुनियेत दुसरे कोणीही नाही. फुले अनेक रंग घेऊन येतात. सुगंधाची मुक्तहस्ते उधळण करणारा फुलांइतक उदार दुसर कुणीही नाही.  जी माणसे सदैव हसरी दिसतात, ती काहीशी फुलासारखी असतात.  निर्व्याज हसणं आणि रंगीबेरंगी  छटांची उधळण निसर्गात करणारी फुल फक्त प्रेम करतात.  प्रेम निसर्गावर, प्रेम वाऱ्यावर, प्रेम भिरभिरणाऱ्या भ्रमरावर आणि प्रेम निर्दयीपणे पादाक्रांत करणाऱ्या पायावर.....! प्रेम कशावर करावं हे जर शिकायचं असेल तर फ़ुलाजवळ जावं लागेल  आणि प्रेमाची व्याख्या पाकळ्यांवर वाचावी लागेल.  रंगांची उधळण मोजावी  लागेल तर सुगंधाची चव घ्यावी लागेल.  निर्व्याजपणे प्रेम आणि फक्त प्रेम, फुलेच  करू शकतात.  फुलांचे प्रेम  कळण्यासाठी बलिदान द्यावे लागत.  खरंतर फुले फार सोसतात. या छळातही टवटवीत हास्य कधीच सोडत नाहीत. हळव मन, हसरी माणसं व फुल ही भाऊक असतात.  म्हणूनच ती जास्त संवेदनशील असतात.

 

 

 कवि हे लेखकापेक्षा जास्त संवेदनशील मनाचे असू शकतात.  वाल्मिकी, व्यासांची भक्तीमय संवेदनशीलता होती.  कुसुमाग्रजांसारखी  प्रेममय संवेदनशीलता, नारायण सुर्वेंसारखी करूणामयी  संवेदनशीलता  तर रामदास फुटाणेंसारखी वात्रट संवेदनशीलता म्हणावी  लागेल. या सर्वात भक्तिमय संवेदनशीलता मला  जास्त श्रेष्ठ वाटते.  भक्ती ही गुरुविषयी, परमेश्वराविषयी  किंवा आराध्यदैवताविषयी असू शकते.  बाल राम कसे होतेबाल रामांचे वाल्मिकीने केलेले वर्णन संवेदनशील मनाची खोली किती असू शकते हे दाखवते. चिंतनशील मन हे संवेदनशील असू शकते. भांडी रोज घासून जशी लख्ख निघतात तसं मन चिंतनाने स्वच्छ होतं.  मनाच्या अनेकविध  पैलूपैकी संवेदनशीलता हा एक पैलू आहे.  जर कोणाला परमेश्वर हवा असेल, तर प्रथम त्याने संवेदनशील बनले पाहिजे.  परमेश्वर प्राप्तीच्या वाटेवर त्याची नितांत आवश्यकता आहे.  अस्तित्व व भावना यांच्या मध्यावर संवेदनशीलता आहे.  तर संवेदनशीलतेच्या जाणिवेत परमात्मा आहे.  परमात्मा कसा? 'अणू रेणूही तोकडा  तुका आकाशाएवढा'.  किती सूक्ष्म व किती व्यापक स्वरूपात परमेश्वराचे अस्तित्व तुकाराम महाराजांनी व्यक्त केले आहे.  हे अस्तित्व जाणून घेण्याच्या भावना संवेदनशीलतेच्या लहरी मानाव्या लागतील. 

 

 

 स्त्रिया खूप हळव्या असतात. पण  हळव्या स्त्रिया संवेदनशील असतीलच असं नाही.  'आपला तो बाबु  आणि......' या म्हणीला स्त्रियांमुळे  बळकटी आली आहे.  पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त संवेदनशील असतात हे मात्र मान्य करावे लागेल.  विषन्न  मन घेऊन झोपडीत बंद करून घेणाऱ्या माऊलींना उपदेश करणारी मुक्ता संवेदनशीलतेचे मूर्तिमंत उदाहरण आहे. संपूर्ण आयुष्य  कन्हैयासाठी अर्पण करणारी मिरा ही एक संवेदनशील नारी होती हे विसरून चालणार नाही. बऱ्याच स्त्रिया नको तिथं संवेदनशीलता दाखवताना दिसतात. भावना आहे म्हणून संवेदनशीलता दाखवणे व संवेदनशीलता आहे म्हणून भावना व्यक्त करणे या दोन परस्परविरोधी गोष्टी आहेत. मातृत्व ही प्रत्येक स्त्रीसाठी मोठी आनंदी  पर्वणी. संवेदनशीलता 'पासून शिकायची  असेल तर आई व्हा. लहान बाळ, पहिला दिवस, पहिला क्षण, पहिला श्वास, पहिली संवेदनशीलता. या कोवळ्या जिवाच्या गरजा आईला संवेदनशीलतेतूनच समजतात.  माता निर्दयी कधीच असू शकत नाही. कारण संवेदनशीलतेचे खोलवर परिणाम तिच्यावर याच काळात होतात. म्हणून प्रत्येक आई  संवेदनशील असते. पर्यायाने स्त्रियातील संवेदनशीलता पुरुषांपेक्षा त्या मानाने जास्त होते. पण कालांतराने या संवेदनशीलतेवर धूळ बसून ती स्वार्थात कधी रूपांतरित होते हे स्त्री जातीच्या लक्षात देखील येत नाही.  एकूणच संवेदनशीलतेच्या व्याप्तीवर काही मर्यादा येऊ शकतात.

 

 

 माझ्या मते जे लोक हट्टी असतात त्यांच्याकडे संवेदनशीलता असते. पण आपल्या हट्टापायी ते  ती कधी वेशीला टांगतील याचा नियम नाही. अशी अनियमित संवेदनशीलता हट्टी  लोकांजवळ असते. याचं मुख्य कारण स्वार्थ आणि वैयक्तिक आकस. प्रभू राम वनवासाला जाण्यामागचं कारण या प्रकारात मोडू शकते. धरसोड करणारी संवेदनशीलता इतरांच्या दुःखाचे कारण होते. संवेदनशीलतेला स्वार्थाचा स्पर्श झाला कि दुःख निर्माण होते.  त्यापुढील सर्व घटना करुणामयी  असू शकतात. म्हणून स्वार्थ संवेदनशीलतेला लागलेला कलंक आहे. स्वार्थ वैयक्तिक व सामाजिक असू शकतो. जपानवर  अणूबॉम्ब टाकताना अमेरिकेचा सामाजिक स्वार्थ होता. जपानमधून बेचिराख झालेली संवेदनशीलता अमेरिका कधीच अनुभवू शकत नाही. तर अणूबॉम्ब टाकण्यामागील राग जपान कधीच विसरू शकत नाही. घडीचा राग अनंतकालावधीच्या  संवेदनशीलतेवर खोल परिणाम करतो. संवेदनशीलता जोपासायची असेल तर घडीच्या स्वार्थावर पाणी सोडणे योग्य. नाही तर अंतःकरणपूर्वक जोपासलेल्या संवेदनशीलतेला  वाळवी लागण्याची शक्यता असते. प्रयत्नपूर्वक जोपासलेली संवेदना ही स्वार्थाच्या किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर असते.

 

 

 घटना घडून गेल्यानंतर त्यावर विचार केला तर संवेदनशीलता आपल्याला तपासून पाहता येते. तिच्या व्याप्तीची चाचपणी आपणास करता येते. बऱ्याच वेळी सरकारी अधिकारी हे संवेदनाहीन असू शकतात. जे सदैव हुकुम सोडण्याच्या  प्रयत्नात  असतात, त्यांना संवेदनशीलता बहुदा जोपासता  येत नाही. स्वतःच्या कोशात हे लोक इतके गुंतून गेलेले  असतात की त्यातून सारासार विचार करणे मागे पडून जाते व त्यातून हुकूमशाही वृत्तीचा आपल्या लोकशाहीत  दर्शन होत. अशा लोकांना आपण चुकतोय हे स्पष्टपणे जाणवते परंतु आपण काहीही करू शकत नाही अशी समजूत ते करून घेतात. अर्थात अशी व्यक्तिमत्व संवेदनशीलता जोपासावी म्हटली तरी त्यांना ते शक्य होत नाही. अशा  लोकांमध्ये प्रासंगिक संवेदनशीलतेचे दर्शन कधी कधी दिसू शकते. पण प्रासंगिक संवेदनशीलता उथळ मनाचे द्योतक आहे व अशी संवेदनशीलता क्षणात क्रोधात रूपांतरित होते. व्यक्ती केलेली संवेदनशीलता ही निव्वळ कुचेष्टा ठरू शकते. संवेदनशीलता ही भावना आहे. तर अधिकाराची  नशा ही वृत्ती आहे. पदावर नसताना संवेदनशीलता जोपासता येईल पण पदावर असताना  संवेदनशीलता जोपासता येईलच असे सांगता येत नाही. बऱ्याचं  वेळा ती जोपासण्याचा  प्रयत्न केला तर ती वरवर वाटणारी व कृत्रिमही असू शकते.  कृत्रिमता  व वरवरपणाचा संवेदनशीलतेशी दुरान्वयेही संबंध नाही. व्यक्त केलेल्या कृत्रिम भावना या फक्त चित्रपटात शोभून दिसतात व जीवन म्हणजे तीन तासाचा खेळ नव्हे आणि संवेदनशीलता म्हणजे कृत्रिम भावना किंवा भावनांशी मांडलेला मेळ नव्हे. संवेदनशीलता जोपासताना, त्यामुळे, असा व्यवहार बाजूला ठेवून थेट हृदयाशी संवाद साधता आला तर अशी व्यक्तिमत्व, माझ्या मते, अधिक खुलून दिसतील.

 

 

 खरंतर  स्वतःवर दुःख  यावं, सदैव दुःखाची साथ आपल्याला असावी  असं कोणालाच वाटत नाही, ते वाटणारही नाही. कारण प्रत्येकाचा प्रवास सुखाच्या दिशेने वेगाने सुरू आहे. कुणाच्या वाट्याला किती सुख मिळालं  हे निश्चित  माहीत नसले तरी हे मात्र ठाम सांगता येईल की, सुख शोधता शोधता माणूस दुःखात होरपळून जातो. सुख शोधणे ही एक बाजू, तर दुःख ही जीवनरूपी नाण्याची दुसरी बाजू आहे. सुख हवे असेल तर दुःख न सांगता येणारच. सुखदुःखांची एकमेकात सुरेख गुंफण आहे. अनेकांना सुखात दुःखाचे दर्शन होते. पण बहुतेकांना दुःखात सुख शोधण्याची दृष्टी नसतेच. सुखापेक्षा दुःखात भावना जास्त चांगल्या प्रकट होतात. सुखात भावना उत्तेजित होतात. पण दुःखात त्या बहरतात. स्वतःवर कोसळलेल्या दुःखामुळे इतरांच्या भावना आपण समजू शकतो. ज्यांच्यावर सदैव दुःखाचे सावट असतं, ते माझ्या मते सर्वात जास्त संवेदनशील असतात. खऱ्या अर्थाने संवेदनशीलतेचे माहेरघर अशा व्यक्तींच्या हृदयात असते.  किंबहुना संवेदनशीलतेची जोपासना व सांभाळ अशी माणसं सदैव करत असतात. दुःखाचा कडवटपणा पचवून, संवेदनशीलता जोपासन हे उदात्त मनाच एक अंग आहे. खऱ्याअर्थाने येथेच संवेदनशीलता खुलून दिसते.

 

 

करुणेचा व संवेदनशीलतेचा जवळचा संबंध आहे. करुणा व संवेदनशीलता जवळजवळच असतात. जिथ कारुण्य आहे तिथे संवेदना, उशिरा का होईना येतेच.  कुष्ठरोगाने हातपाय नेले पण म्हणून कुष्ठरोग मन दुबळं करू शकत नाही. कारण बाबा आमटे ही एक संवेदनशीलता या करुणेला हात देते व मनाला बळ देते. बाबा आमटे.....अनेक करुणामयी ह्रदयांना आसरा देणारे महापुरुष. तरुणपणात काय नव्हतं या वेड्यापाशी? उच्चशिक्षण, आदर्श व्यवसायिक पात्रता, मनात आणलं असतं तर पैशाचा पाऊस पडता आला असता. पण नाही. करुणा पाहिली आणि संवेदनशीलता धावून गेली. बाबा आमटेरुपी संवेदनशीलतेने करुणेला कवठाळे, अलगद घट्ट मिठी मारली आणि सुरू झाला मानवतेचा प्रवास...... अनंत काळासाठी सुरू झालेल्या या प्रवासाची जगातील कानाकोपऱ्यांनं दखल घेतली. ही सेवामय संवेदनशीलता चकित करून सोडते. कोण ही व्यक्ती? ती काय व कसे आपले कार्य करीत असेल? अशी भावना मनात सहज उमटून जाते. आयुष्यभरासाठी व्यक्त केलेली संवेदनशीलता  मानवतेची मशाल म्हणावी लागेल. कारण अनेक करुणामयी तुटलेल्या भावनांना तिनं जगण्याचं बळ व कारण दिलेले असते. अशी अनेक करुणामयी अंतःकरणे या सेवाभावी संवेदनशीलतेच्या सावलीखालीच आधार घेत असतात व ही संवेदनशीलता मोठ्या प्रेमाने, मायेने या करुणेला धीर देते.

 

 

 या जगामध्ये जी माणसं संवेदनशील नाहीत, ती प्रयत्नपूर्वक तशी कदाचित बनू शकतील. मात्र व्यापारी कधीच संवेदनशील बनू शकणार नाहीत. हे ठामपणे सांगण्याची आवश्यकता नसावी. व्यापार हा वस्तूंचा होऊ शकतो. त्याचा मोबदला ज्याला त्याला मिळेल. वस्तूचा भाव ठरेल. पण भावाची भावना व्यापारात कधीच परावर्तित होऊ शकणार नाही. भावनांची खरेदी-विक्री अजून तरी कोणत्या व्यापाऱ्याने सुरु केली नाही. भावनांचा व्यापार म्हणजे मानवतेची केलेली क्रूर चेष्टा होय. संवेदनशीलता नफा व तोट्याच्या ताळेबंदपत्रकावर आधारित व्यक्त केली जाणारी जिन्नस नाही. व्यापारी धनाचा चोख विनियोग करणारा संवेदनरहित व्यवसायिक होय. सर्वच व्यापारी हे संवेदनशून्य असतीलच असं नाही. त्यांनी संवेदनशील असावं असं कुठं नाही. किंबहुना संवेदनशीलतेने केलेला व्यापार दिवाळखोरीचा राजमार्ग आहे. तुकाराम महाराजांनंतर असा राजमार्ग आनंदाने धारण करणारा आनंदमयी आनंदयात्री व्यापारी ऐकवीत नाही. भावनांचा दर ठरवणारे दरपत्रक  आपणाला अजून तयार करता आले नाही. तर भावनांसाठी किती मोल ठरवाव, अस सांगणारा एकही व्यापारी नाही. व्यापारी तत्त्वावर भावना व्यक्त होऊ शकत नाहीत. त्या या तत्त्वावर व्यक्त झाल्या तर ती संवेदनशीलता नव्हे, तर शुद्ध व्यापार  होय. संवेदनशीलता दिली व घेतली जाते. पण तरीही इथे कुठे व्यापारी तत्व निदर्शनास येत नाही. संवेदनशीलतेचा व्यवहार होतोय. पण व्यापार नाही. संवेदनशीलता जणू पाण्यात वाढणाऱ्या कमळाप्रमाणे मानावी लागेल. कारण पाण्यात राहूनही पाण्यापासून अलिप्त राहणं किती अवघड आहे, हे कमळापेक्षा दुसरं कुणीच सांगू शकणार नाही. व्यापारात संवेदनशीलता जोपासता येईल. पण संवेदनशीलतेत व्यापार कधीही जोपासता येणार नाही. अशी संवेदनशीलता ही संवेदनशीलता कमी व व्यापार जास्त होईल. व्यापारात संवेदनशीलता जोपासणे म्हणजेच एका म्यानात दोन तलवारी ठेवण्याचा व्यर्थ खटाटोप होय.

 

 

 जगामध्ये इतकी दुःख आहेत, अनेक यातना सहन करूनही जगणारे धडपडी जीव आहेत. काही लोकांच्या पाहण्यात व अनुभवात हे सदैव येत असते. पण अशी माणसं त्यांच्यासाठी संवेदनशीलता दाखवण्याऐवजी अधिकाधिक निष्ठुर व दगडी काळजाची होतात. जणू आपण त्यांच्यापैकी नव्हे. आणि तो जो भोगतो आहे, त्याचं त्यांन पहावं. अशी संवेदनशीलता म्हणजे भावरहित अंतःकरणाचा चांगला नमुना होय. दुःख, कष्ट, यातना आहेत तर ते दूर करणारी संवेदनाही आहे. या दृष्टिकोनातून ते कधीच विचार करू शकत नाहीत. अशा व्यक्तीने काही क्षणासाठी जरी संवेदनशीलता दाखवली तरी, बऱ्याच अंशी सृष्टी नंदनवन होऊन जाईल. इतरांसाठी शुद्ध भावना व्यक्त करताना त्रास होतो. स्वतःचा विचार सोडून इतरांसाठी करावं लागतं, वेळ, पैसा वाया जातो. पण नाही. वारा सदैव वाहतो. प्रत्येक श्वासात आपल्याला नवीन जीव देऊन जातो. पण त्याचं मोल तो कधी मागत नाही. सूर्य अविरतपणे प्रकाश व अग्नी देऊन आपल्याला जगायला कारणीभूत ठरतो. त्याने कधी त्याचं मोल मागितलं नाही. पाणी प्रत्येक वेळी जीवन बहाल करते. त्याचं मोल कुठे मागते? नाही. सृष्टीतील अनेक तत्व अशी आपल्यासाठी अविरतपणे विनामूल्य अत्यावश्यक सेवा अखंडपणे पुरवीत असतात. हा निव्वळ परोपकार आहे. तो भावनां सहित किंवा भावनारहित व्यक्त होतो. मग आपल्याला थोडं कष्ट, थोडा पैसा, थोडा वेळ भावनासहित गेला तर बिघडलं कुठं ? आपण संवेदनशीलतेने केलेले आचरण यातनातीत जीवांसाठी किती आजीवन उपकार पर्वणी ठरू शकते. याची जाणीव या बोथट मनांना  कधीतरी झाली पाहिजे. तसा त्यांनी किमान प्रयत्न तरी केला पाहिजे. एक प्रयत्न, दोन प्रयत्न, अनेक प्रयत्न, अशा अनेक प्रयत्नातून उमटणाऱ्या आनंदलहरी मनाला बळ देऊन शेवटी आपल्या प्रयत्नातील हिशोब चुकत्या करून टाकतात. मदर तेरेसा या लोकविलक्षण बाईने मंदिरात देव शोधला नाही. गोरगरिबांची अंतःकरणपूर्वक संवेदनशील सेवा करून कीर्तीची झालर पांघरून अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या. दुनयेत दुःख व मानवता जोपर्यंत आहे, तोपर्यंत त्यांचा विसर शक्य नाही. गांधीरुपी महामानव दुःख, अन्याय व अत्याचार दिसला की धावून गेला. जगात परमेश्वरानंतर गांधी रुपी रसायनच जाहीरपणे संवेदनशील असू शकते. काही संवेदनशील व्यक्तिमत्व दुःखावर तुटून पडतातअन्यायावर औषध ठरतात तर हिंसेसाठी उत्तर ठरतात. त्यातील उच्चकोटीचे व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा गांधी. संवेदनशीलतेचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे महात्मा गांधी. कोणीही या. पात्रता नाही. उपसा हवी तितकी संवेदनशीलता, दया, प्रेम......मोल नाही.....जा घेऊन.....फुलवा आपली जीवनयात्रा.....मोफत.....अगदी मोफत......गांधीरुपी  संवेदनशील परीसाला ज्यांनी स्पर्श केला, त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत  सोनेरीपणा गेला नाही. भावना, प्रेम, दया, अहिंसा या सदाचारी बुद्धीची पदवी घ्यावी ती गांधी विद्यापीठातूनच.

 

 

 दहा गाभाभूत घटकांपैकी एक संवेदनशीलता आहे. दहा गाभाभूत घटक राष्ट्रीय आहेत. राष्ट्राच्या उन्नती व भरभराटीसाठी आपण ते निर्माण केले आहेत. पण हळूहळू आपण सर्वजणच संवेदनशून्य होतोय. संवेदनशीलता फक्त मानवजातीसाठीच राखून ठेवली नाही. केवळ तिचा या भावनेतून विचार करणे म्हणजे स्वार्थ तत्परतेने व संकुचित भावनेने केलेला विकसित विचार होय. मुक्या असहाय्य जनावरापासून हवेत स्वच्छंदपणे भरारी मारणाऱ्या पाखरापर्यंत आणि वाऱ्याच्या  हेलकव्यावर मनमुराद डोलणार्या झाडाच्या प्रत्येक पानापासून अनंत सागराच्या तळापर्यंत संवेदनशीलता व्यापून राहिलेली आहे. 

 

पक्षांवर नितांत प्रेम करणारे पक्षीप्रेमी,जनावरांचे पोटच्या पोराप्रमाणे लालन-पालन, आरोग्य व काळजी घेणारे पशूप्रेमी व अव्यक्त भावनांना बांध फोडून जाणीवपूर्वक वाढ व जोपासना करणारे वनप्रेमी ही काही उच्च उदात्त अंतकरणाची संवेदनशीलता म्हणावी लागेल. संवेदनशीलतेचे हे मेरूमणी होत. मानवी संवेदनशीलता व्यक्त करता येते. ज्यांची संवेदनशीलता उच्च कोटी पर्यंत पोहोचली आहे अशीच व्यक्तिमत्व अव्यक्त भावना समजावून घेऊ शकतात. पशू, प्राणी, पक्षी, लता,वेली, जलचर यांना दुःख, यातना आहेत. हे समजणे व ते दूर करून त्यांच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे म्हणजेच मानवतावादीपणाचे अत्युच्च शिखर होय.  अशी व्यक्तिमत्वाने व्यक्त केलेली संवेदनशीलता ही सामान्य माणसाने व्यक्त केलेल्या संवेदनशीलतेपेक्षा कितीतरी पटीने निराळी व अलौकिक आहे, सर्वश्रेष्ठ आहे. क्षणासाठी का होईना पशुपक्ष्यांवर प्रेम, दया दाखवणे ही मुळात मानव जातीसाठी परमोच्च संवेदनशीलता आहे. ती धारण करण्याची पात्रता आपल्या अंगी असेल तर आपणही तिच्याबरोबरच उच्च पदापर्यंत पोहोचू शकतो. क्षणासाठी दया दाखवली तरी चांगली. जीवनभर दया दाखवली तर ती सोन्याहून सोनेरी होय. मानवतेचा मुकुट परिधान करून वावरणारे महामानवच अशा प्रकारची उच्च प्रतीची संवेदनशीलता व्यक्त करू शकतात. प्राणी-पक्षी, मुके जीव त्यांच्यासाठी लक्ष आशीर्वाद राखून ठेवतात. ते आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि त्यातून मिळणारी धन्यता दुसरे कोणीही अनुभवू शकत नाही किंवा ती नेमक्या शब्दात व्यक्त होत नाही. जरी ती शब्दातून व्यक्त झाली तरी त्या धन्यतेला पूर्णत्व येऊ शकत नाही. पशुपक्षी व मानवेतर जीवांसाठी व्यक्त केलेली संवेदनशीलता मानवतावादी संवेदनशीलता होय.

 

 

 संवेदनशीलता प्रत्येकाजवळ असावी. इतरांसाठी व्यक्त केलेली संवेदना परोपकाराच्या भावनेतून असते. पण किमान स्वतःसाठी तरी प्रत्येकाने काही अंशी संवेदना दाखवणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा आपल्या मनाच्या व शरीराच्या भावनात्मक गरज असू शकतात. पण निर्दयी हृदयाला त्याचा ठावठिकाणा लागत नाही व आपण चुकतोय हे शेवटी जाणवते. स्वतःला स्वतःविषयी विचार करायला लावणारी वेळ, स्वतःसाठी संवेदनशीलता धारण न केल्याचे परिणाम असल्याचे बऱ्याच वेळेला असू शकते. उदात्त हेतू राहू द्या पण किमान स्वतःच्या हितासाठी तरी प्रत्येकाने ही निर्लेप संवेदनशीलता जोपासली पाहिजे. स्वतःसाठी जोपासता जोपासता ती कालांतराने इतरांसाठी व्यक्त होईल. कारण भावना स्वतःसाठी व भावना इतरांसाठी यात अनेक पटीने भावनिक अंतर आहे. इतरांसाठीची सद्भावना वैयक्तिक सद्भावनेपेक्षा श्रेष्ठ व सर्वव्यापी आहे. पण बऱ्याच वेळा इतरांसाठी सद्भावना व्यक्त करता येत नसेल तर ती व्यक्त करण्यास शिकताना स्वतःपासून सुरुवात करून हळूहळू इतरांसाठी व्यक्त करायला शिकलं पाहिजे. त्यातून मिळणारं समाधान अव्यक्त, अवर्णनीय व शब्दातीत असत. दुसऱ्यांसाठी जर आपण संवेदनशीलता दाखवत असेल तर ती परमेश्वराने सेवा करण्याची आपल्याला संधी दिल्यासमान आहे.

 

 

निस्वार्थी संवेदनशीलता ही कधीही चांगली व उच्च प्रतीची होय. शक्य झाल्यास अशाच प्रकारच्या भावलहरी मनात उमटवण्याचा हेतुपुरस्पर प्रयत्न झाला पाहिजे. जगात सुख, संपन्नता, सुंदरता, विशालता जेवढी आहे त्याहूनही दुःख, यातना, हाल, करूणा, विषमता, विदारकता, दारिद्र्य व लाचारी आहे. ती कमी व्हावी ही भावना जरी उमटली तरी चांगल. ती कमी करण्याच्या दृष्टीने उचललेले पहिले पाऊल त्याहूनही चांगलं व त्यासाठी आपलं आयुष्य वेचणे सर्वात चांगले. परमेश्वराने दिलेल्या मूल्यातील हे एक उत्कृष्ट मूल्य आपल्या अंगी बाळगून त्या प्रति आपला व्यवहार ठेवणे म्हणजेच स्वतः जगता-जगता इतरांना जगवन्यासमान आहे. चांगुलपणा हा भावनेतून घातला जाणारा सुंदर सडा आहे तर प्रेम हे त्यावर रेखाटलेली सुंदर रांगोळी आहे. आपली पावलं अशा प्रेमयुक्त रांगोळीरुपी भावनांवर पडणे म्हणजे मनात संवेदनशीलता विकसित करणे होय.140106 ©Harish Gore

https://www.facebook.com/harishgore26

https://www.facebook.com/harish.gore.54/ 


Prof. Agarwal sir Vaduj

 Dear Agarwal sir, It was pleasent experience for me to read your 'A Pryayer to My God, the Man'. A deep touch to heart by reading a...